का?
का?
असं विचारलं तर कोणाला फारसं आवडत नाही. विशेष करून विचारणारी वयाने लहान व्यक्ती असेल तर. पण हा प्रश्न विचारला जातो तेव्हाच नव्या शक्यतांचा जन्म होतो. एखादी गोष्ट अमूक पद्धतीनेच का करावी? वेगळ्या पद्धतीने नाही का करता येणार? सरधोपट मार्गानेच आपणही का जावे? असे प्रश्न ज्यांना पडतात ते नवे शोध लावतात, नवीन वाटा चोखाळतात. म्हणूनच हा का? जो आहे त्याचा आदर करावा. त्याला मिटवण्याचा प्रयत्न करू नये.
लहानपणी कुणी सांगायचे, मांजर आडवी गेली तर काम होत नाही. १३ हा आकडा अशुभ आहे. कित्येक इमारतींमध्ये १३ नंबरच देत नाहीत. क्रिकेटमध्ये १११ हा नंबर अशुभ मानतात. त्याला नेल्सन म्हणतात. जिथे का? हा प्रश्न उच्चारला जात नाही तिथे अशा अंधश्रद्धा बळावतात.
ह्या का? मध्ये नवे समाज, राहणीमान, चालीरीती निर्माण करण्याची शक्ती आहे. प्रचलित समज, व्यवस्था ह्यांना आव्हान देण्याची ताकद आहे. म्हणून आता जर हा प्रश्न कानी पडला तर विचारणार्या व्यक्तीकडे नीट लक्ष द्या.
ह्यावरून आठवले. कपिल देवची पहिली टूर होती. नाइट वाॅचमन म्हणून त्याला दिवसाची राहिलेली दहा पंधरा मिनिटे खेळून काढण्यासाठी पाठवला. नाइट वाॅचमनचे काम हा वेळ चेंडू ब्लाॅक करत काढणे हे असते. कपिल किती आक्रमक खेळाडू आहे त्याची कल्पना तेव्हा कोणालाच नव्हती. कपिलने तेवढ्या वेळात एक चौकार व एक षटकार ठोकला व नाबाद वीस धावा काढून तो परत आला. तेव्हा कप्तान बिशनसिंग बेदीने त्याची चांगलीच कानउघाडणी केली. पण ह्याच कपिल देवने भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून दिला.
रवींद्र शेणोलीकर
Comments
Post a Comment