नाट्यत्रयी

गेल्या रविवारी महेश एलकुंचवार लिखित नाट्यत्रयी, वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी व युगान्त, गडकरी रंगायतनला बघितली. फारसा ताण जाणवला नाही. कारण पहिली दोन नाटके खिळून ठेवणारी होती. युगान्त मात्र फारसं आवडलं नाही. पहिल्या दोन नाटकांच्या पंक्तीत बसत नाही असं वाटलं. पहिल्या दोन नाटकांचे स्टार म्हणजे प्रसाद ओक, वैभव मांगले व निवेदिता सराफ. दुसर्‍या व तिसर्‍या नाटकात काम करणारे चिन्मय मांडलेकर व सिद्धार्थ चांदेकरही चांगली छाप पाडतात. ह्या सर्वातही मला निवेदिताचे काम अतिशय भावले. याआधी तिला फक्त चित्रपटात पाहिले होते. पण रंगभूमीवर ती इतका उत्कृष्ट अभिनय करते हे माहित नव्हते. तसंच एका प्रसंगात प्रसाद ओकने सर्व प्रेक्षकांसमोर बसून आरामात दाढी केली आहे. ती करताकरता त्याचे संभाषण चालू आहेच. मी कोपरापासून हात जोडले. ह्याला म्हणतात आत्मविश्वास. वैभव मांगलेनी मोठा भाऊ उत्तम साकार केला आहे. शिवाय पौर्णिमा मनोहरने अंजली छान साकार केली आहे. मग्न तळ्याकाठी मला सगळ्यात जास्त आवडले. एलकुंचवारांचे भाषावैभव जागोजागी डोकावत असते. चंद्रकांत कुलकर्णींचे दिग्दर्शन लाभलेली ही नाट्यत्रयी आवर्जून पाहावी अशीच आहे.

Comments

Popular posts from this blog

A visit to Madam Bedi

Anna Karenina Musical

गोल्डा - एक अशांत वादळ